गुरुपौर्णिमा जवळ आली आणि गुरुचे महत्व सांगणाऱ्या लेखांची, मेसेजेसची रेलचेल सुरु झाली. आध्यात्मिक गुरु, महान कलाकार घडवणारे गुरु, शैक्षणिक गुरु, क्रीडा क्षेत्रातील गुरु अशा कुठल्याही क्षेत्रात आपल्याला ज्ञान देणारे गुरु हे  महानच आहेत. त्याची सुरुवात आपल्याला जन्म देणाऱ्या माउलीपासून होते. ती आपला पहिला गुरु. त्यासर्वांचा आदर करावा हेच आपली संस्कृती सांगते.

गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णू  हेच म्हणत आपण लहानाचे मोठे झालो. आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला  परमेश्वराचे स्थान दिले आहे. मग एक असा विचार मनात येतो कि हे स्थान फक्त माणसांपुरते मर्यादित का ठेवायचे?

जर ज्ञान देणारा म्हणजे गुरु असा विचार केला तर निसर्ग हा आपला  सर्वात मोठा गुरु आहे. अश्मयुगापासून माणूस अनेक गोष्टी निसर्गापासून शिकत आला आहे आणि आजही अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. मग हा निसर्ग आपला गुरु नाही का?

त्यातील पंचमहाभूते,  प्राणी,पक्षी आपल्याला अनेक गोष्टी शिकवीत असतात. एक एक काडी गोळा करून पिलासाठी घरटं बांधणारी सुगरण ममते बरोबरच आपल्याला स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना शिकविते.  हजारो मुंग्या, मधमाश्या कोणत्याही व्यवस्थापनाशिवाय कोणतीही गडबड, गोंधळ न होता उत्तमरीत्या काम करतात व अन्न , मध जमा करून आपल्या समाजाला आणि पुढच्या पिढीला जगवितात. आपल्याला त्या निस्वार्थीपणाची आणि उत्तम व्यवस्थापनाची शिकवण देतात

कोणीही न सांगता आपल्या वाट्याच्या कामाची जबाबदारी घेऊन निभावणे ह्याला आज संशोधकांनी  ‘स्वार्म लॉजिक ‘   हे नाव दिले आहे आणि त्याचा वापर विजेचे वितरण, रहदारीचे नियंत्रण यासाठी कसा करता येईल ह्यावर संशोधन चालू आहे.

मैलोनमैल उडत जाऊन स्थलांतर करणाऱ्या पक्षांवर संशोधक अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या उडण्याच्या रचनांवर, त्यांनी निवडलेल्या मार्गांचा अभ्यास करून, त्याचा उपयोग विमान प्रवासात इंधन वाचवण्यासाठी कसा करता येईल याचा अभ्यास चालू आहे.

अशा अनेक उदाहरणांवरून आपल्याला हे लक्षात येतं कि प्राणी, पक्षी सुद्धा आपल्याला शिकवतात म्हणजे तेही आपले गुरु आहेत. त्याचप्रमाणे वनस्पती, नद्या, डोंगर याचे निरीक्षण करून माणसाने ज्ञान संपादन केले आहे. त्यामुळे एकूण निसर्ग आपला मोठा गुरु आहे असा म्हणता येईल

आयुष्यात अनेक प्रसंगातून आपण बरेच काही शिकत असतो. मग तो आपल्या आयुष्यात घडलेला असेल किंवा दुसऱ्यांच्या असेल. तो आपल्याला शिकवून जातो. अपयश, आजारपण, संकट, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू या सर्व प्रसंगातून आपण शिकत असतो. अनुभव हा माणसाचा मोठा गुरु आहे हे त्यामुळेच म्हटले आहे.

मग हे गुरुपण आपण एखाद्या माणसाच्याच गळ्यातच का घालायचे? ‘हे विश्वची माझा गुरु’ अस का नाही म्हणता येणार? असा एक विचार करण्यात  काय हरकत आहे?

ज्याप्रमाणे ज्ञानाचा साठा सर्वत्र आहे त्याचप्रमाणे हि ज्ञानाची देवाण घेवाण सर्वत्र आणि अखंड चालू असते. एक क्षण एक गुरु होऊन दुसऱ्याला ज्ञान देत असतो तर तोच दुसऱ्या क्षणी शिष्य होऊन ज्ञान संपादन करत असतो. असा हा खेळ अविरतपणे चालू असतो. म्हणजे कोणीच पूर्णवेळ गुरु नसतो आणि कोणीच पूर्णवेळ शिष्य नसतो  ज्यावेळी आणि जेथून मार्गदर्शन होतं तो गुरु. त्याक्षणी मार्गदर्शन करणाऱ्यामध्ये गुरुचं, त्या गुरुत्वाचं अस्तित्व असतं. त्या क्षणामध्ये गुरु चे अस्तित्व असते.  मग ते गुरुत्त्व माणसापुरतं  मर्यादित न राहता कोणाच्याहि माध्यमातून अनुभवाला येत आणि त्याचा अनुभवही वेगवेगळा येतो.

मग अशा त्या वैश्विक अस्तित्वालाच आपण गुरु मानलं तर काय होईल? तसं केल्याने स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती यापैकी कशाचीही मर्यादा राहणार नाही. अशी एकही जागा नसेल जिथे आपला गुरु नाही. अश्या सर्वत्र व्यापून राहिलेल्या गुरुला आपण गुरुतत्त्व असे म्हणतो ज्याप्रमाणे वायू, आप, तेज, जल आणि पृथ्वी हि तत्व सर्वत्र आहेत त्याप्रमाणे हे ‘गुरुतत्त्व’ सुद्धा सर्वत्र व्यापलेले आहे.    आपण जिथून अपेक्षा करू तिथून आपल्याला ते मार्गदर्शन करते.

गुरुतत्त्व म्हणजे काय? तर मार्गदर्शक मुलतत्व. जे आपल्याला विविध माध्यमांतून मार्गदर्शन करते. म्हणजे माणूस, पशु पक्षी, अनुभव या सर्वांमधून किंबहुना आपल्या स्वतःमधूनही मार्दर्शन करते. प्रत्येकामध्ये त्याचे अस्तित्व आहे त्यामुळे कोणीच लहान किंवा मोठा नाहीए. प्रत्येकामध्ये तितकीच क्षमता आहे परंतु तिचा उपयोग करण्याची अपेक्षा आहे.

पण मग आपण काय करायची गरज आहे? तर आपल्यामधील विद्यार्थी जागा ठेवायचा आहे आणि त्याच्याकडून मार्गदर्शन स्वीकारायचे आहे. एकच प्रसंग असतो पण त्यातून काहीजण शिकतात तर काही शिकत नाहीत त्यामुळे शिकणे हि शिष्याची जबाबदारी असते. गुरुतत्त्व आपल्या प्रत्येकामध्ये आहे पण ते सुप्त स्वरूपात असते ज्यावेळी ते प्रकट होते त्यावेळी आपल्याला गुरुची प्रचिती येते.

ते आपल्यालाच नाही तर पशु, पक्षी, निसर्ग ह्यामधून त्यांनाही मार्गदर्शन करतं . ह्या सर्व विश्वाचा समतोल सांभाळला जावा हि त्याची अपेक्षा असते आणि त्यासाठी ते मार्गदर्शन करायला तत्पर असते पण आपण आपल्यातच इतके गुरफटलेले असतो कि आपल्याला ते स्वीकारण्याची गरजच वाटत नाही.

आज आजूबाजूला बघितल तर जाणवतं कि ह्या समतोलाची अतिशय गरज आहे. माणसाने विज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे पण ती करताना नैसर्गीक संपत्तीचा वापरही प्रचंड करत आहे, निसर्गातील ह्या गोष्टी मर्यादित आहेत आणि एक दिवस त्या संपणार आहेत. त्यावेळी माणसांबरोबर इतर प्राण्याचा नाशही अटळ आहे. आणि इतके करून आपण आनंदी आहोत का? आजच्या इंटरनेटच्या व्हर्चुअल युगात फायदे नक्की मिळतात पण मानसिक शांतता मिळते का? प्रत्येक जण आज सुख बाहेर शोधू पाहतोय आणि त्यासाठी पैसा, सत्ता, प्रसिद्धी ह्याच्यामागे जो तो धावतोय परंतु नक्की आनंद कुठे आहे हे मात्र सापडत नाहीये. त्यामुळे आजूबाजूला हिंसा, नैराश्य, व्यसनाधीनता, स्वार्थीपणा, आत्महत्या यांचं प्रमाण वाढलेलं  दिसतं . हळूहळू सगळ्यांचा संयम कमी होत चालला आहे. आणि त्याचा अनुभव आपल्याला रोज रस्त्यावर येतो , प्रत्येकाला पुढे जायचे आहे . थांबण्यासाठी वेळच नाही.

पण आपण हे विसरतो कि आपण एकटे जगत नसतो. आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, पशुपक्षी, निसर्ग ह्यांच्या बरोबर एकत्रिक जगणे असते. वर्षानुवर्षे आपण बघत असलेलं एखाद झाड तोडलं कि कशी मनाला रुखरुख लागते हे अनुभवलं आहे कधी? घरातली एक मोठी वस्तू जर नाहीशी झाली तर अस्वस्थता येते कारण त्या सर्वांसह आपलं एकत्रित अस्तित्व असतं . त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर कोणी दुःखी असेल तर आपण सुखी होऊ शकत नाही .

ह्यातून योग्य मार्ग सापडण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. एकाच व्यक्तीने, धर्माने, संस्कृतीने केलेलं मार्गदर्शन आपल्या आजच्या परिस्थितीला लागू पडेलच असं  नाही . आज personalization ( वैयक्तिकीकरणाचे)  च युग आहे . प्रत्येकाला स्वतःच्या गरजेप्रमाणे प्रत्येक गोष्ट हवी असते. कारण प्रत्येक व्यक्ती, तिच्या गरजा, आवडीनिवडी, परिस्थिती, मनस्थिती वेगळी असते. मग हे जर वस्तू खरेदी करताना, सॉफ्टवेअर वापरतांना आवश्यक आहे तर मग लाखो करोडो लोकांना एकच उपदेश कसा चालेल? ज्या त्या माणसाला ज्या त्या परिस्थितीनुसार मार्गदर्शन मिळायला पाहिजे आणि ते फक्त आपल्या आतून आणि या विश्वरूपी गुरुतत्त्वाकडूनचं मिळू शकतं. तो  personalized guidance असतो .

त्यासाठी स्वतःला हे मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी सक्षम बनवण्याची गरज आहे. निसर्गाप्रमाणे आपल्यातही हि क्षमता आहे पण लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे आपण विसरलो आहोत. ह्या विश्वरूपी गुरुतत्त्वाकडून मार्गदर्शन कसे स्वीकारावे हे सांगणारा योग म्हणजेच गुरुतत्त्वयोग !! या विश्वातील आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडणे आणि ते करताना आपल्याबरोबर बाकीच्यांचेही आयुष्य सुखी करण्यासाठी गुरुतत्त्वयोग आहे.   त्यामुळे एक धर्म, देव, पंथ, व्यक्ती ह्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःतील आणि विश्वातील ह्या गुरुतत्त्वाची कास धरून सर्वांनी आपले आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांचं आयुष्य सुखी आणि समाधानी करावे हीच आपण प्रार्थना करूया